मुंबई : बांगलादेशात अजूनही सव्वा कोटी हिंदू आहेत. जर ते एकत्र आले, तर ते स्वतःच्या सुरक्षेसाठी तिथल्या राजकारणाचा उपयोग करू शकतात. सुदैवाने, यावेळी त्यांनी पळणार नाही, तिथेच राहून लढू असा निर्णय घेतला आहे. तिथल्या हिंदूंना बळ देण्यासाठी आम्ही आमच्या मर्यादेत राहून जे काही शक्य आहे ते सर्व करू, याची खात्री मी देतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. आरएसएस व्याख्यानमालेत मोहन भागवत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.
अखंड भारत आणि २०४७ चे स्वप्न
मोहन भागवत म्हणाले की, २०४७ मध्ये भारत विभाजनाची भीती बाळगण्यापेक्षा अखंड भारताच्या उदयाची कल्पना करा. जे ५०० वर्षे बादशहा करू शकले नाहीत किंवा २०० वर्षे इंग्रज करू शकले नाहीत, ते आता स्वतंत्र भारतात का होईल? हे १९४७ नाही, आता आपण खूप पुढे गेलो आहोत. भारताला तोडणारे स्वतःच तुटतील, पण भारत जोडला जाईल आणि हे आपण करून दाखवू. लोकसंख्येच्या बाबतीत तीन मुख्य कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या तीन-चार वर्षांपासून सरकार यावर प्रयत्न करत आहे आणि ते विफल होणार नाहीत, असे आम्हाला वाटते.
संघ आणि सरकारवर काय म्हणाले?
मोहन भागवत म्हणाले की, आम्ही बॅक सीट ड्रायव्हिंग करत नाही. जे लोक सरकारमध्ये आहेत तेच सरकार चालवतात, आम्ही नाही. आम्हाला जर काही चांगल्या आणि उपयुक्त गोष्टी माहीत झाल्या, तर आमचे स्वयंसेवक त्या तिथपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात, त्यापलीकडे आम्ही जात नाही, असे त्यांनी सागंतिले.
सामाजिक सजगता आणि सुरक्षा
भागवत म्हणाले की, घातपाताच्या घटना आणि वेडेपणा पूर्णपणे बंद होईल असे नाही, पण जर समाज सजग असेल, तर ९० टक्के नियंत्रण मिळवता येते. उरलेले १० टक्के देवाच्या मर्जीवर असते. समाजाची सुरक्षा आणि तयारी ही सर्वात मोठी गरज आहे. समाजात अनुशासन (शिस्त) आणि आपुलकी असेल तरच व्यवस्था पक्की राहते. आपल्याला काही देणेघेणे नाही, असा विचार न करता समाजाने सक्रिय आणि सजग राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. यूकेमध्ये १ लाख हिंदूंच्या संमेलनासाठी फक्त ८० पोलीस होते, कारण तिथे स्वयंशिस्त होती. याउलट तिथल्याच फुटबॉल मॅचेसमध्ये ८ हजार पोलीस असूनही दंगली होतात, असे ते म्हणाले.